रक्षाबंधन के बाद आजारी मावस बहिणीला भेटण्यापूर्वीच काळाचा घाला, बहीण-भावाचा मृत्यू
लातूरच्या रेणापूरजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने बहीण-भावाचा जागीच मृत्यू झाला. आजारी मावस बहिणीला भेटण्यासाठी निघालेल्या कुटुंबातील आई व चिमुकला पुतण्या गंभीर जखमी झाले.
तस्वीर में लातूर-रेणापूर मार्ग पर सड़क दुर्घटना के बाद जमीन पर पड़े दो व्यक्तियों के शव दिखाई दे रहे हैं।
लातूर : रक्षाबंधनाचा सण साजरा केल्यानंतर आजारी मावस बहिणीची भेट घेण्यासाठी रेणापूरकडे निघालेल्या सख्ख्या बहीण-भावाचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. रेणापूर ग्रामीण रुग्णालयाजवळ भरधाव साहित्याने भरलेल्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने प्रतीक सतीश क्षीरसागर (२४, रा. धर्मापुरी, हल्ली मुक्काम कव्हा रोड, लातूर) आणि त्यांची विवाहित बहीण कल्याणी राघू घोबाळे (२०, रा. मुंबई) यांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी दुपारी साडेदोनच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत त्यांची आई माया सतीश क्षीरसागर आणि चिमुकला पुतण्या साई प्रशांत क्षीरसागर गंभीर जखमी झाले आहेत.
रेणापूर तालुक्यातील सेलू-जवळगा येथील मावस बहीण नंदिनी विलास भोसले आजारी असल्याने त्यांना उपचारासाठी रेणापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी प्रतीक क्षीरसागर, त्यांची बहीण कल्याणी, आई माया सतीश क्षीरसागर आणि पुतण्या साई प्रशांत क्षीरसागर हे चौघे दुचाकीवरून लातूरहून रेणापूरकडे निघाले होते.
ग्रामीण रुग्णालय काही अंतरावर असतानाच मागून भरधाव वेगाने आलेल्या केए-३९, ८१६० क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील प्रतीक आणि कल्याणी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात माया क्षीरसागर आणि चिमुकला साई हे गंभीर जखमी झाले.
ज्या मावस बहिणीला भेटण्यासाठी बहीण-भाऊ रेणापूरला निघाले होते, त्याच रुग्णालयाच्या अगदी जवळ हा अपघात झाला. रुग्णालय जवळ आले असतानाच झालेल्या या दुर्घटनेमुळे त्यांची भेट अधुरी राहिली. काही क्षणांतच सणाचा आनंद शोककळेत बदलला आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
अपघाताची तीव्रता एवढी होती की, ट्रकच्या धडकेनंतर मृतदेह काही अंतरापर्यंत फरफटत गेले. घटनास्थळी रक्ताचा सडा पडल्याचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते.
मयत कल्याणी घोबाळे मुंबई येथे राहत होती. रक्षाबंधनाच्या सणानिमित्त ती सुमारे दहा दिवसांपूर्वी माहेरी आली होती. भावासोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केल्यानंतर आजारी असलेल्या मावस बहिणीची भेट घेऊन पुन्हा गावी जाण्याचे तिचे नियोजन होते. मात्र, मावस बहिणीला भेटण्यापूर्वीच झालेल्या भीषण अपघातात तिच्यासह तिच्या भावाचा दुर्दैवी अंत झाला.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या माया क्षीरसागर आणि चिमुकला साई क्षीरसागर यांना लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत नातेवाईकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक तसेच चालकाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने माहेरी आलेली कल्याणी भावासोबत आजारी मावस बहिणीला भेटण्यासाठी निघाली होती. मात्र, रुग्णालयाच्या उंबरठ्यावर पोहोचण्यापूर्वीच झालेल्या अपघाताने बहीण-भावाची साथ कायमची तुटली. या दुर्घटनेने रेणापूरसह लातूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.