Third Mumbai Gears Up for Creative Revolution
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बीकेसी येथे झालेल्या 'WAVES 2025' कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्जनशीलता आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांतिकारी पाऊले उचलण्याची घोषणा करण्यात आली. ‘स्टुडिओ आणि तंत्रज्ञान’ या विषयावर पार पडलेल्या राऊंड टेबल चर्चेत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले, ज्याचा केंद्रबिंदू ठरला, नवी मुंबई परिसरात उभारण्यात येणारा एक जागतिक दर्जाचा सर्जनशील इकोसिस्टम आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, 'तिसरी मुंबई' या नावाने ओळखली जाणारी ही नवी संकल्पना महाराष्ट्राच्या क्रिएटिव्ह आणि मीडिया इंडस्ट्रीला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेईल. यामध्ये अत्याधुनिक थीम पार्क्स, स्टुडिओ आणि व्हर्च्युअल प्रोडक्शन सुविधा असतील. गोदरेज आणि प्राइम फोकससारख्या मोठ्या ब्रँड्ससोबत सामंजस्य करार (MoUs)ही करण्यात आले आहेत.
IICT: नव्या पिढीसाठी नवीन संधी :
या उपक्रमाचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे IIT मुंबईच्या सहकार्याने स्थापन होणारे ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ (IICT). ही संस्था नव्या पिढीला व्हिज्युअल मीडिया, गेमिंग, VFX, अ‍ॅनिमेशन, ई-स्पोर्ट्स यांसारख्या सर्जनशील क्षेत्रांमध्ये व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण देईल. यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी देशांतर्गतच नाही, तर आंतरराष्ट्रीय करिअर संधी निर्माण होतील.
ई-स्पोर्ट्स आणि कंटेंट निर्मितीसाठी धोरणात्मक पाठबळ:
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, ई-स्पोर्ट्ससारख्या नव्या आणि झपाट्याने वाढणाऱ्या क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष धोरण आखले जाणार आहे. यासाठी प्रशिक्षण केंद्रे, पायाभूत सुविधा आणि फंडिंगच्या संधी निर्माण केल्या जातील.
चित्रीकरण परवानग्यांसाठी ‘सात दिवसांत मंजूरी’ योजना:
चित्रपट, वेबसिरीज, जाहिराती आणि इतर व्हिज्युअल कंटेंटच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या परवानग्यांची प्रक्रिया आता पारदर्शक व जलद करण्यात आली आहे. कोणतीही चित्रीकरण परवानगी आता केवळ सात दिवसांत मिळणार असल्याचेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.
बॉलीवूड आणि उद्योग क्षेत्राचा सहभाग :
या राऊंड टेबल चर्चेत अभिनेता आमिर खान, FICCIचे आशिष कुलकर्णी, उद्योजक पी. जयकुमार रेड्डी, विविध स्टार्टअप्सचे प्रतिनिधी आणि तज्ज्ञ मंडळींचा सहभाग होता. सर्जनशील उद्योगांसाठी हा निर्णय ‘गेमचेंजर’ ठरणार असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
महाराष्ट्र आता केवळ आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानी न राहता, सर्जनशीलतेच्या क्षेत्रातही जागतिक नेतृत्व घेण्यास सज्ज झाला आहे. 'तिसरी मुंबई' प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य सरकारने जागतिक दर्जाच्या क्रिएटिव्ह इकोसिस्टमकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.
Editorial

Editorial

Next Story