कोल्हापूर: जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त (११ जुलै) कर्मवीर हिरे महाविद्यालयाच्या भूगोल विभागामार्फत जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात लोकसंख्या वाढ, तिचे परिणाम, लोकसंख्या नियंत्रणाची आवश्यकता आणि लोकसंख्या संक्रमण सिद्धांत या विषयांवर विद्यार्थ्यांमध्ये विशेष जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी लोकसंख्या वाढ, तिचे सामाजिक-आर्थिक परिणाम, नियंत्रणाची गरज आणि भारताची सध्याची लोकसंख्या स्थिती यावर आधारित माहितीपूर्ण भित्तिपत्रिका सादर केल्या. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार भारत सध्या तिसऱ्या टप्प्यात असून, लोकसंख्या स्थिर होण्यासाठी आणखी काही वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

या उपक्रमात मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य उदयकुमार शिंदे यांनी सांगितले की, जगाची लोकसंख्या ८०० कोटींचा टप्पा पार करून पुढील काही वर्षांत आणखी वाढणार आहे. त्यामुळे भविष्यातील लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन आतापासूनच नियोजनबद्ध निर्णय घेणे आवश्यक आहे. देशाचे भविष्य असलेल्या युवकांमध्ये आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक जबाबदारीबाबत सजगता निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. संजय देसाई, मौनी विद्यापीठ कर्मचारी प्रतिनिधी डॉ. अरविंद चौगुले, बीएबीडी समन्वयक श्रीमती शारदा पाटील, सहसमन्वयक डॉ. राम मेढेकर, तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभागप्रमुख डॉ. संजय पाटील यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. गौतमी कांबळे यांनी पार पाडले, तर आभार प्रा. विक्रम राऊत यांनी मानले. लोकसंख्या वाढीच्या आव्हानांवर युवकांना सजग करण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश पूर्ण झाला.

Pratahkal Newsroom

Pratahkal Newsroom

प्रातःकाल न्यूज़-रूम, प्रातःकाल न्यूज़ की वह समर्पित संपादकीय टीम है, जो सटीक, समयबद्ध और निष्पक्ष समाचार पहुँचाने के लिए प्रतिबद्ध है। हमारा न्यूज़-रूम राजनीति, समाज, अर्थव्यवस्था और राष्ट्रीय मामलों में सत्यापित रिपोर्टिंग, गहन विश्लेषण और जिम्मेदार पत्रकारिता पर अपना ध्यान केंद्रित करता है।

Next Story