जालना: जालना महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. न्यायालयाचे स्पष्ट आदेश आणि 'जैसे थे' (Status Quo) स्थितीचे निर्देश पायदळी तुडवत, संग्राम नगर भागातील एका चहाच्या दुकानावर अतिक्रमण विभागाने केलेली तोडफोड सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या अन्यायकारक कारवाईच्या विरोधात आता वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांकडे दाद मागितली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष हरिष आंबादास रत्नपारखे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनानुसार, बस स्टँड रोड परिसरातील संग्राम नगर येथील शेख महेबूब शेख रशीद कुरेशी यांच्या चहाच्या दुकानावर प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना किंवा कायदेशीर नोटीस न देता ही कारवाई केली. विशेष म्हणजे, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आणि न्यायालयाने जैसे थे परिस्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिलेले असतानाही मनपाच्या अतिक्रमण विभागाने दुकानाचे बांधकाम तोडले. दुकानदाराने मालमत्ता कर भरल्याच्या अधिकृत पावत्या दाखवूनही कर्मचाऱ्यांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप पीडित दुकानदाराने केला आहे.

या मनमानी कारभारामुळे दुकानदाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदार भूमिकेवर संताप व्यक्त केला जात आहे. वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची आणि दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, नुकसानग्रस्त दुकान मालकाला योग्य नुकसानभरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आघाडीने दिला आहे. यावेळी शेख महेबूब शेख रशीद कुरेशी, इरफान कुरेशी, नदीम शेख, समीर शेख आणि आर्यन चौधरी यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. प्रशासनाच्या या कारवाईमुळे आता जालना महानगरपालिकेत खळबळ उडाली असून, न्यायव्यवस्थेच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

Pratahkal Newsroom

Pratahkal Newsroom

प्रातःकाल न्यूज़-रूम, प्रातःकाल न्यूज़ की वह समर्पित संपादकीय टीम है, जो सटीक, समयबद्ध और निष्पक्ष समाचार पहुँचाने के लिए प्रतिबद्ध है। हमारा न्यूज़-रूम राजनीति, समाज, अर्थव्यवस्था और राष्ट्रीय मामलों में सत्यापित रिपोर्टिंग, गहन विश्लेषण और जिम्मेदार पत्रकारिता पर अपना ध्यान केंद्रित करता है।

Next Story