जालना शहरातील अंबड रोड परिसरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या वावरामुळे आणि नागरिकांवरील हल्ल्यांच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने संतप्त नागरिकांनी जालना महानगरपालिकेच्या निष्क्रियतेवर ताशेरे ओढले आहेत. बुधवारी सकाळी १० वाजता प्राप्त माहितीनुसार, अंबड रोडवरील नरेश कॉम्प्लेक्स परिसरात स्कूटरवरून जाणाऱ्या एका तरुणावर भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला केला. तरुणाने स्वतःची सुटका करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र कुत्र्याने त्याला सोडले नाही. अखेर स्थानिक नागरिकांनी धाव घेत तरुणाची सुटका केली.

परिसरात रेबीजची लक्षणे असलेले आणि जखमी कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही महिन्यांपूर्वीच याच परिसरात एका चिमुकलीचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्या भीषण घटनेनंतरही प्रशासनाने कोणतीही सुधारणा केली नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे. यावर सामाजिक कार्यकर्ते नरेश अवघड यांनी संतप्त सवाल उपस्थित केला असून, आणखी किती निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार, अशी विचारणा केली आहे. या भागातील नागरिक आता कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी तातडीने पकड मोहीम राबवण्याची मागणी करत आहेत. जर संबंधित विभागाने त्वरित उपाययोजना केल्या नाहीत आणि भविष्यात कुत्र्यांच्या हल्ल्यात जीवितहानी किंवा नागरिक जखमी झाल्यास, त्यास संबंधित विभागप्रमुख आणि कुत्र्यांचे पकड व पुनर्वसन करणाऱ्या संस्थेला जबाबदार धरून त्या संस्थेला काळ्या यादीत टाकावे, अशी आक्रमक मागणीही नागरिकांनी केली आहे.

Pratahkal Newsroom

Pratahkal Newsroom

प्रातःकाल न्यूज़-रूम, प्रातःकाल न्यूज़ की वह समर्पित संपादकीय टीम है, जो सटीक, समयबद्ध और निष्पक्ष समाचार पहुँचाने के लिए प्रतिबद्ध है। हमारा न्यूज़-रूम राजनीति, समाज, अर्थव्यवस्था और राष्ट्रीय मामलों में सत्यापित रिपोर्टिंग, गहन विश्लेषण और जिम्मेदार पत्रकारिता पर अपना ध्यान केंद्रित करता है।

Next Story