"लोकसंख्या नियंत्रण हीच शाश्वत विकासाची गुरुकिल्ली": प्राचार्य डॉ. उदयकुमार शिंदे
कोल्हापूर येथील कर्मवीर हिरे महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त ऑनलाइन क्विझचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य डॉ. उदयकुमार शिंदे यांनी लोकसंख्या नियंत्रण आणि शाश्वत विकासाचे महत्त्व विशद करत तरुणांना जबाबदारीची जाणीव करून दिली.

गारगोटी येथील कर्मवीर हिरे महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग आयोजित ऑनलाइन क्विझच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य आणि शिक्षक उपस्थित.
कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथील श्री मौनी विद्यापीठ अंतर्गत कर्मवीर हिरे महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागामार्फत जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त ऑनलाइन Google Quiz चे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे उद्घाटन शनिवारी दि. ११ जुलै रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. उदयकुमार शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या दालनात पार पडले. तरुणांमध्ये लोकसंख्या, आरोग्य व पर्यावरणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हे विशेष पाऊल उचलण्यात आले आहे.
यंदाच्या जागतिक लोकसंख्या दिनासाठी "Realizing the hopes and aspirations of young people – today and for the future" म्हणजेच आज आणि भविष्यासाठी तरुणांच्या आशा व आकांक्षा साकार करणे, ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. याच संकल्पनेच्या आधारावर लोकसंख्या संतुलन, कुटुंब कल्याण आणि शाश्वत विकासाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी या Quiz चे आयोजन केले होते.
उद्घाटनप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राचार्य प्रो. डॉ. उदयकुमार शिंदे म्हणाले की, लोकसंख्या ही जरी राष्ट्राची मोठी शक्ती असली, तरी तिचे योग्य नियोजन आणि नियंत्रण करणे ही काळाची गरज आहे. वाढती लोकसंख्या, बेरोजगारी, नैसर्गिक संसाधनांवरील ताण, पर्यावरणीय समस्या आणि शाश्वत विकासाची आव्हाने लक्षात घेता, प्रत्येक नागरिकाने लोकसंख्याविषयक जागरूक राहणे आवश्यक आहे. त्यांनी तरुणांना आवाहन केले की, लोकसंख्या, आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण यांचा परस्परसंबंध समजून घेऊन त्यांनी एक जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडावी. तसेच, अशा ऑनलाइन उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानवृद्धी, स्पर्धात्मक वृत्ती आणि संशोधनाची आवड निर्माण होण्यास मदत होते, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रो. डॉ. ए. एम. प्रधान यांनी केले, ज्यामध्ये त्यांनी या ऑनलाइन Google Quiz चा मुख्य उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. एस. बी. देसाई, स्टाफ प्रतिनिधी डॉ. शहाजीराव वारके, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. जितकर, बी.ए.-बी.एड. विभाग समन्वयक शारदा पाटील, मराठी विभाग प्रमुख डॉ. ए. बी. कांबळे, डॉ. पी. पी. डांगे, प्रा. अतिश चव्हाण आणि रणजीत आबिटकर आदी मान्यवर उपस्थित होते. जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून राबवलेला हा उपक्रम जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे.

