'वज्रगड' आदिलशाहीपासून स्वराज्यापर्यंतचा प्रवास...
पुणे जिल्ह्यातील सासवडजवळ असलेला वज्रगड हा इतिहासाचा जिवंत साक्षीदार आजही ताठ उभा आहे. पुरंदर किल्ल्याचा जोड किल्ला असलेल्या वज्रगडाने स्वराज्याच्या घडणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. सध्या भारतीय सैन्य दलाच्या ताब्यात असलेला हा किल्ला पर्यटकांसाठी बंद असला तरी त्याचा ऐतिहासिक वारसा आजही प्रेरणादायी आहे.

- साक्षी कुलकर्णी
महाराष्ट्राच्या इतिहासात गडकोटांना अतिशय मानाचे स्थान आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गड फक्त दगडांची रचना नाहीत तर मराठी सामर्थ्य, स्वातंत्र्याची आस आणि युद्धकलेचे प्रतीक आहेत. प्रत्येक किल्ला त्या त्या भागाच्या भौगोलिक वैशिष्ट्यानुसार बांधलेला असून त्याच्या स्थापत्यातून त्या काळातील कारागिरीची ओळख पटते. याच गडकोटांपैकी पुणे जिल्ह्यातील वज्रगड हा एक ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा किल्ला आहे।
वज्रगड हा पुरंदर किल्ल्याचा जोड किल्ला म्हणून ओळखला जातो. तो पुणे जिल्ह्यातील सासवडपासून अवघ्या अठरा किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. पुरंदर आणि वज्रगड यांना जोडणारी भैरवखिंड या दोन्ही किल्ल्यांमधील दळणवळणासाठी महत्त्वाची होती. आज वज्रगडावर भारतीय सैन्य दलाचे प्रशिक्षण केंद्र असल्यामुळे पर्यटकांना किल्ल्यावर प्रवेश दिला जात नाही. तरीसुद्धा, इतिहासप्रेमींसाठी वज्रगडाचे महत्त्व कमी झालेले नाही।
आर्टिफिशियल इंटेलिजन्स; बदलत्या जगाचे धडधडते हृदय
माळशेज घाटाच्या कुशीतील ऐतिहासिक रत्न म्हणजे 'सिंदोळा किल्ला'
ऐतिहासिक अभ्यासानुसार वज्रगड यादव काळात बांधण्यात आला होता. त्यानंतर बहमनी सत्ताकाळात चंद्रसंपत देशपांडे यांनी किल्ल्याची डागडुजी केली. आज किल्ल्यावरून जीर्ण प्रवेशद्वार, उंच बुरुज, पाण्याची टाकी, मारुती मंदिर, शिव मंदिर आणि वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. इ.स. १४८९ मध्ये निजामशाही सत्तेखाली असलेला हा किल्ला नंतर आदिलशाहीच्या ताब्यात गेला. याच काळात आदिलशाहीचा सरदार फत्तेखान विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या पराक्रमी मावळ्यांनी येथे लढा देऊन किल्ला स्वराज्यात सामील केला।
इ.स. १६६५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी वज्रगडावर नेताजी पालकर यांची किल्लेदार म्हणून नेमणूक केली होती. त्या काळात स्वराज्याचे महत्त्वाचे कामकाज वज्रगडावरून चालत होते. पुढे इ.स. १७३७ मध्ये वसई मोहिमेदरम्यान चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली वज्रगडाने मोलाची साथ दिली. ही मोहीम पोर्तुगीजांवर मोठा विजय मिळवून देणारी ठरली आणि वज्रगडाचे लष्करी महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले।
हा किल्ला छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये असल्यानेही महत्त्वाचा ठरतो. आदिलशाहीतून स्वराज्यात समाविष्ट झाल्यानंतर वज्रगडावरून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले, जरी नंतर स्वराज्याची राजधानी राजगडकडे हलवण्यात आली. तरीही, वज्रगडाने स्वराज्य स्थापनेच्या लढ्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली।
आज वज्रगड भारतीय सैन्य दलासाठी महत्त्वाचे प्रशिक्षण केंद्र आहे. इतिहासातील त्याची तेजस्वी भूमिका आजही त्याच्या उभ्या भक्कम बुरुजांतून जाणवते. एकेकाळी मराठ्यांच्या स्वराज्य रक्षणाची शपथ घेणारा हा किल्ला आजही भारताच्या संरक्षणासाठी तितक्याच निष्ठेने उभा आहे. वज्रगड हे केवळ पुरंदरचे जोड किल्ला नसून, महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे आणि शौर्याचे प्रतीक आहे।

