चावंड किल्ला : इतिहासाच्या साक्षीचा वारसा
साक्षी कुलकर्णी
सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेले असंख्य गिरीदुर्ग हे आपल्या मराठी मायभूमीचा इतिहास सांगणारे साक्षीदार आहेत.या गिरीदुर्गांच्यामुळेच आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीचे संवर्धन झाले आहे. चावंड किल्ला हा पुणे जिल्ह्यातील इतर गिरीदुर्गांच्या बरोबरीने महत्त्वपूर्ण ठरलेला किल्ला आहे.
चावंड किल्ला जुन्नर तालुक्यातील पुणे जिल्ह्यामध्ये आहे. चावंड किल्ल्यास चामुंडगिरी, चुंडगड, जोंड, प्रसन्नगड अशा अन्य नावांनी देखील ओळखले जाते. जुन्नर तालुक्यातील कुकडेश्वर गावाजवळ व कुकडी नदीच्या उगमस्थानानजीक चावंड किल्ला वासला आहे. चावंड किल्ल्यांचे मूळ नाव हे चामुंडा असे आहे पण पूर्वापार लोकांकडून चामुंडा नावाचा अपभ्रंश होत आला आणि चावंड असे संबोधले जाऊ लागले.
चावंड किल्ला / प्रसन्नगड किल्ला माहिती  Chavnad / prasanngad Fort information in Marathi
सध्या किल्ल्यावरती दगडामध्ये कोरलेल्या पायर्‍या, गणेश दरवाजा, जुन्या तोफा, पाण्याची टाकी, हेमाडपंती पद्धतीचे शिव मंदिर, पुषाकरणी तलाव, चामुंडा देवीचे मंदिर, दीपमाळ, सप्तमातृका टाकी (ब्राह्मणी, वैष्णवी, माहेश्वरी, इंद्राणी, कौमरी, वाराही, चामुंडा),प्राचीन तीन गुफा कक्ष (शस्त्रागार कक्ष,मध्यवर्ती कक्ष,लहान कक्ष) अशा प्रकारच्या जुन्या वास्तूंचे काही सुस्थितीतील व भग्नावस्थेतील अवशेष पाहावयास मिळतात.

इतिहास साहित्याच्या अभ्यासानुसार आणि नोंदींनुसार चावंड किल्ला सातवाहन कालखंडमध्ये निर्माण झाला आहे. किल्ल्यावर असणारे दगडी बांधकाम व गुफांची बांधकाम शैली हुबेहूब सातवाहन वास्तूकलेशी जुळणारी आहे हे आपल्याला चावंडची सफर करताना लक्षात येते.
सन १४८५ मध्ये चावंड किल्ला निजामशाहीचा स्थापक मलिक अहमदकडे होता. निजामशाहीच्या कालखंडमध्ये चावंड किल्ल्याच्या परिसरातील लोकांना निजामांच्या नियमांना सामोरे जावे लागत होते. इ.स.१६३६ च्या सुमारास आदिलशाह व शहाजीराजे भोसले यांच्यामध्ये तह झाला आणि चावंड किल्ला निजामांच्याकडून मोघलांच्याकडे गेला.
अशा प्रकारे चावंड किल्ल्यावरील निजामशाहीची राजवट संपली व मोघलाई सुरू झाली. या मोघल साम्राज्याचा राजा शहाजहान आणि संपूर्ण मोघलाईमध्ये प्रचंड हर्ष पसरला होता कारण चावंड किल्ल्याच्या साहाय्याने हिंदू अथवा मराठी मुलूखामध्ये मोघलाईचे साम्राज्य पसरवणे सोपे झाले होते. या किल्ल्यावरून शहाजहानच्या मार्गदर्शनाखाली मोघल साम्राज्याचा राजकीय व सांस्कृतिक विस्तार केला जात होता.
इ.स.१६९४ मध्ये शहाजहान पुत्र औरंगजेब याने चावंड किल्ल्यावरती सुरतसिंग गौंडा यास प्रमुख म्हणून कार्यरत करण्याचे योजले होते. सुरतसिंग गौंडा चावंड किल्ल्याकडे येण्याकरिता मार्गस्थ होता तोपर्यंत हिंदू साम्राज्याने चावंड किल्ला मराठी मुलूखामध्ये सामावून घेण्याची मोहिम यशस्वी केली. चावंड किल्ल्याची राजवट मग मोघलाईकडून शिवशाहीकडे आली.
शिवशाही कालखंडमध्ये छ. शिवाजी महाराजांनी चावंडचे नामांतर करून प्रसन्नगड असे ठेवले. हा किल्ला छ. शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली फार राहिला नव्हता कारण नंतर पुन्हा मोघलाईच्या बहादुरशाहने चावंड किल्लावर आक्रमण केले व किल्ल्याचा ताबा मिळवला होता.बहादुरशहाने चावंडवर ताबा मिळवल्यानंतर हा किल्ला पेशवाई कालखंडापर्यंत मोघलांच्या ताब्यामध्येच राहिला.
पेशवाई कालखंडमध्ये चावंड किल्ल्यावरून राजकीय कामकाज पाहिले जात होते. पेशवाई कालखंडामध्ये गुप्त राजकीय चर्चा आणि इतर राजकीय महत्त्वाचे काम करण्याचे नियोजन चावंड किल्ल्यावरून होत होते. नंतर इंग्रजांनी भारतामध्ये आक्रमण केले. इंग्रजांनी भारतातील बऱ्याच ऐतिहासिक वास्तूची नासधुस केली होती. चावंड किल्ल्यावर देखील इंग्रजांनी तोफगोळ्यांचा मारा केला होता, सुरुंग लावून बऱ्याचशा भागांचे नुकसान केले होते.

आपण आजही त्यांच्या हल्ल्याचे परिणाम भोगत आहोत असे म्हटले तर गैर ठरणार नाही कारण त्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे किल्ल्यावरील बराचसा भाग मोडून पडला आहे. इंग्रजांच्या या हल्ल्यामुळे चावंड किल्ल्यावरील बराचसा ऐतिहासिक ठेवा आज आपल्याला भग्नावस्थेमध्ये पाहावयास मिळतो.
हे ही वाचा :
Updated On
Editorial

Editorial

Next Story