Pratahkal - News Update - Very heavy rain in the next 24 hours!
मुंबई : येत्या २४ तासात राज्यात पावसाचा जोर (Heavy Rain)आणखी वाढणार असून अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (Department Of Meteorology) वर्तवला आहे.
राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला असून बळीराजा सुखावला आहे. अनेक भागांत पेरणीची लगबग सुरू झाली आहे. मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्राच्या अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी भूस्खलनही झाले. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईसह रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, त्यामुळे उद्या या भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे कोल्हापूर, सिंधुदुर्ग, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे परिसरात पाणी साचले. तर ठाण्यातही मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. या पावसाचा फटका मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेलाही बसला आहे. मुसळधार पावसाने उपनगरीय लोकल रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या ७ दिवसात चांगला पाऊस झाला असला तरी अजूनही अनेक जिल्ह्यांत पाऊस सरासरी पेक्षा खूप कमी आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पुढील काही दिवस पाउस सक्रिय राहील. पुढील २४ तासात पावसाचा जोर आणखी वाढणार असून अलर्ट जाहीर केलेल्या जिल्ह्यातील जनतेने महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
Editorial

Editorial

Next Story