Pratahkal-CM K. Chandrashekar Rao-entire Cabinet of Telangana will come to visit Vithuraiya

तेलंगणा, दि. २२ (वृत्तसंस्था) : आषाढी वारीसाठी लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. या आषाढी वारीच्या महासोहळ्यात सहभागी होण्यासाठी तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (CM K. Chandrashekar Rao) पंढरपुरात (Pandharpur) येणार आहेत. त्यांच्यासोबत तेलंगणा सरकारचे (Government of Telangana) संपूर्ण मंत्रीमंडळ देखील हजेरी लावणार आहे. तसेच हेलिकॉप्टरमधून वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. ३०० गाड्यांच्या ताफ्यातून हे मंत्रीमंडळ महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल होणार आहे.
'अब की बार किसन सरकार' असे म्हणत बीआरएस पक्ष महाराष्ट्रात जोरदार एंट्रीच्या तयारीत आहे. यासाठी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी थेट वैष्णवांचा महामेळा असणाऱ्या आषाढी यात्रेचा मुहूर्त निवडला आहे. आषाढी वारीसाठी गेले अनेक वर्षापासून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग येत असतात. पण आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आता संपूर्ण मंत्रीमंडळासह विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येणार आहेत. आषाढीच्या एक दिवस आधी मुख्यमंत्री दर्शनाला येतील. सोबत तेलंगणाचे सर्व मंत्रिमंडळ त्या दिवशी पंढरपुरात असेल. परवानगी मिळाली तर ते वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करणार आहेत.
देशात शेतकऱ्यांचे (Farmer) राज्य आणण्याची घोषणा देत कामाला लागलेले चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस (BRS) पक्षाच्या गळाला महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते लागले आहेत. यातच महाराष्ट्रात पक्ष संघटना वाढवण्यासाठी बीआरएसने वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठ्या महासोहळ्याची निवड केली आहे. यासाठी त्यांनी आषाढ शुद्ध नवमीची निवड केली आहे. या दिवशी चंद्रशेखर राव हे पंढरपूरला येऊन विठुरायाचे दर्शन घेणार आहेत. खरे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे दशमी दिवशी म्हणजे २८ जून रोजी पंढरपूरमध्ये येत असताना त्याच्या एक दिवस आधी चंद्रशेखर राव पंढरपुरात पोहोचणार आहेत. देशात शेतकऱ्यांचे राज्य येऊ दे असे साकडे ते शेतकरी, कष्टकऱ्यांच्या या देवाला करणार असल्याची माहिती बीआरएस राज्याचे समन्वयक शंकर आण्णा धोंडगे यांनी सांगितले.
आषाढीपूर्वीच पुण्यापासून सर्व पालखी मार्गावर आणि पंढरपूर शहरात बीआरएसकडून जोरदार होर्डिंगबाजी करण्यात आली आहे. यातच आता खुद्द या पक्षाचे अध्यक्ष पंढरपूरला येणार असल्याने या आषाढी यात्रेत राजकीय वातावरण देखील तापणार आहे. काही दिवसापूर्वी पंढरपूरचे भगीरथ भालके यांनी चंद्रशेखर राव यांची भेट घेऊन बीआरएस पक्षात प्रवेश संदर्भात चर्चा केली होती. आता आषाढीला चंद्रशेखर राव येत असताना त्यांच्या स्वागतासाठी भगीरथ भालके आणि त्यांची भलीमोठी टीम सज्ज असणार आहे. आता आषाढीला येणाऱ्या या राजकीय नेत्यांपैकी पंढरीचा पांडुरंग कोणाला पावणार? हे येणारा काळच ठरवेल.

Editorial

Editorial

Next Story